मो.मोडॉनेय-पुन्हा एकदा.

वेंडीला वाटतं, की बंगलोरसारख्या शहरामध्ये राहणं, तेही सिंगल मुलगी म्हणून - कधीकधी डोकं कचकचवणारं असतं.

एकतर इथे सर्व जोडीने चालतं.

मुलगा-मुलगी, मुलगा-मुलगा, मुलगी-मुलगी. रस्ते, शॉपिंग मॉल्स, थेटर्स .. कुठे म्हणून एकटीच मुलगी, एकटाच मुलगा आनंदात फिरतायेत, विंडो शॉपिंग करतायेत - असं फार क्वचित दिसतं. अतिशय पादऱ्याफुसक्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठीही कोणीतरी सोबतीला लागतं. 

तुम्हाला बॉयफ्रेंड असला म्हणजे शनिवार-रविवार, सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जायला हक्काचा जोडीदार मिळतो. तुमची मैत्रीण असून भागत नाही, कारण त्या मैत्रिणीलाही नियमपरत्वे एक बॉयफ्रेंड असतो. आणि सर्वजण जोडीनेच आल्याने एकट्याने आलेला मुलगा/मुलगी म्हणजे गैरसोयीचं मानलं जातं. 

चांगलंचुंगलं खायला प्रचंड आवडणाऱ्या वेंडीचे मात्र यात मधल्यामध्ये हाल होतात. रेस्टॉरंट्समध्ये हल्ली हल्ली दोन सीट्सवालं सीटिंग आलंय, नाहीतर आधी चार सीट्सवाल्या सीटवर एकटीनेच बसलं, की वेंडीमागे खोळंबलेलं एक प्रेमाळू जोडपं वेंडीला "हिला कळत कसं नाही?" वाला लुक देतं. जोडीने आलं की तुम्हाला सर्व माफ असतं. एकतर रेस्टॉंरंट्सना एकटीचं खाणं बनवणं जमत नसावं किंवा ते ज्या रेसिपी वापरतात, त्या दोघांसाठी असाव्यात. कारण काहीही असो, पण कोणतीही डिश एकटीने संपवणं हे महाकठीण काम असतं, आणि उरलेलं अन्न पार्सल करायला लावून अन्नाची ती शिळी कलेवरं दुसऱ्या दिवशी खाण्यातही काही आनंद नसतो. बरं, दोघांचं जेवण संपवेल वेंडी, पण नंतर वाढलेल्या वजनावर डोकेफोड करत बसण्यातही काही अर्थ नसतो. अतिविचार करून कॅलरीज जळल्या असत्या तर किती छान झालं असतं!

तर,  या सर्वांवर उपाय काय - तर कंपनी असणं. 

सिंगल सर्व्हिंग तुम्हाला फक्त फाइन डायनिंगमध्ये मिळतं, पण त्यासाठी तितक्याच पटीत पैसे मोजावे लागतात. सिंगल आहात तर त्याचा भुर्दंडही भरा असं काहीसं तोंडावर फेकून मारल्यासारखं. कोल्हापुरात महालक्ष्मी भक्तनिवासवाल्यांनी वेंडीला "आम्ही एकट्या मुलीला खोली देत नाही" बोलल्यावर वाटलेलं तसं. क्विनाइन फ्लेव्हरवालं.

सिंगल म्हणजे मराठीत नेमकं काय? वेंडीला नाही वाटत मराठीत तितका विचार झालाय. 

अविवाहित? नाही 

एकटी? अजिबात नाही.

मुक्त? अं.. बहुतेक. बाय चॉइस असू तर.. पण त्या शक्यता खूप कमी.

लेबल्स खूप अजब असतात.

मुलींच्या मानाने वेंडीचं मुलांशी फार चांगलं पटतं. मुलींशी मैत्री करण्यामध्ये जी बारीक प्रतवाऱ्या काढून घेतलेली पॉलिटिक्स असतात, डायनॅमिक्स असतात, ती मुलांसोबतच्या मैत्रीत कमी असतात. तिथं तुलनेत सरळसोट कारभार असतो. आहे तर आहे..नाही तर नाही. त्यामुळे मला कधी कंपॅनियन हवा झालाच, तर पुरुषच असेल.

राहता राहिली गोष्ट बॉयफ्रेंडची. तर तिथेही काम सोपं नाही.

एखादा मुलगा खूप लाडात येतो म्हणून नकोसा वाटतो आणि एखादा मुलगा स्वत:हून काहीच बोलत नाही म्हणून त्रास होतो. एखादा मुलगा आपल्याला न विचारता मित्रांशी भेट घालून देतो म्हणून डोक्यात भक्कन् जातो, तर एखादा त्याच्या मित्रांना भेटवत नाही तेव्हा त्याला आपली लाज वाटते का असा विचार करून आपण त्रास करून घेतो.  बाष्कळ बोलणारा गहन बोलत नाही म्हणून, गहन बोलणारा सबटायल्सशिवाय समजत नाही म्हणून, सलगी करणारा ठरकी आहे म्हणून, दूरदूर राहणारा रोमॅंटिकच नाही म्हणून, झोपलीस का? जेवलीस का? असं शंभरदा विचारून पीडतो म्हणून न आवडणारा, रात्री-अपरात्री घरी एकटी आलो तर 'पोहोचलीस का?' इतकं पण विचारत नाही म्हणून त्रास करून घ्यायला लावणारा..

आपल्याला नेमकं हवंय कोण? 

हवंय की नकोय? 

कधीकधी वेंडी बसून विचार करते तेव्हा तिला वाटतं, की खूप चॉइस असल्याचा हा परिणाम आहे का? तिने एखाद्या मुलाशी स्वत:ला बांधून घेतलं, तर त्यानंतर तिला भेटणाऱ्या प्रत्येक ग्रेट मुलासोबत नातं जोडण्याच्या शक्यता आपसूकच नाहीश्या होतात. तसं खरं व्हायला नको, पण कशात काही नाही..फक्त डेटिंग सुरू आहे, पण दुसऱ्या मुलाकडे नुस्तं पाहण्यालाही प्रतारणा वगैरे समजायचा जमाना आहे. आणि हा/ही दुसऱ्याच्या गळाला लागला/लागली, तर आपल्याला आणखी एक मुलगा/मुलगी गाठायला लागेल, दाढी/वॅक्स करायला लागेल, ग्रूमिंग करायला लागेल, त्यांच्यासोबत चार-पाच रेस्टॉरंट्सचं बिल, सिनेमा.. पुढच्या सात-आठ महिन्यांचं बजेट कोलमडायला लागलं, की मग आपल्याला त्या 'करंट' मुला/मुलीशी बांधून घेण्यातला सोयिस्करपणा पटायला लागतो, त्याने/तिनेही आपल्याला सोयीखातर पत्करलं आहे ही वस्तुस्थिती मनाशी ठेवून.

बंगलोर हे इंस्टंटनेसवर चालणारं महानगर आहे. सगळ्या गोष्टी फटाफट. वाट पहायला लागत नाही, ताटकळावं लागत नाही. १५ मिनिटांमध्ये डिलिव्हरी. १५ मिनिटांमध्ये तू नाही दिलीस, तर दुसरा आहेच. इथे सगळ्या गोष्टींसाठी अ‍ॅप्स असतात. स्वाइप, स्वाइप..डन!

तुलनेत लॉंग टर्म काहीतरी शोधणाऱ्या वेंडीसारख्या मुलीचं मग जे काही व्हायचं ते होतंच.

वेंडीला वाटतं, आपल्याला जशा प्रकारचे पुरुष हवे आहेत तसे पुरुष आपणच बनलो, तर आपली ही कंपॅनियनची गरज नाहीशी होईल का?

माझ्यासारख्या मुलीला माझ्यासारखी मुलगी आवडेल का?

आपल्याला कंपॅनियन हवाच असेल तर तो का? की मी ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीने मला पार्टनर असायलाच हवा असं वाटायला लावलंय त्यामुळे? 'माझेपण' त्याशिवाय पूर्ण होणारच नाही जणू काही.

अधूनमधून येणारे एकटेपणाचे उमाळे सोडता मी आनंदी आहे. ही गोष्ट कोणाला समजेल का?

बरं, त्या अधूनमधून येणाऱ्या एकटेपणाच्या फेफऱ्यामध्ये वेंडी डेटिंगच्या फंदात पडलीच, तर डेटिंगचे नियम खूप अजब असतात.

स्वत:हून फोन नंबर मागायचा नाही. 

स्वत:हून पहिले मेसेज करायचा नाही. 

स्वत:हून कॉल करायचा नाही. 

पुन्हा भेटायचं का हे आपणाहून विचारायचं नाही.

पुढे भेटण्याचे वायदे होतात, येऊन भेटण्याचं आमंत्रण दिलं जातं, पण फोन नंबर कोणीच शेअर करत नाही, हे कसं काय?

मग असं फक्त तोंडदेखलं म्हटलं जातं का? याचं उत्तर 'हो' असेल, तर तसं का आहे?

कोण बनवतं हे भैताड नियम?

'He's just not that into you' नावाचा छपरी चित्रपटही मग अशा सिच्युएशन्समध्ये गर्भितार्थ वगैरे सांगणारा चित्रपट वाटायला लागतो.

डेटिंगमधलं तुमचं तुमच्याबद्दलचं मत हे तुमचं नसतं मुळी. ते तुमच्यावतीने इतरांनी तुमच्याबद्दल बनवून घेतलेलं मत असतं. 

मला अमुक ठमुक करायला आवडेल का? यावर I would 'love' to असं म्हटलं की मुलगी गळ्यात पडतेय असं वाटण्याइतपत भाषेचं इंटरप्रीटेशन सवंग कधीपासून व्हायला लागलं? एखादी मुलगी पॅशनेटली, इन्टेन्सली बोलते आहे याचा अर्थ ती आपल्या प्रेमात पडलिये असा समज करून घेणं हे आताचंच आहे की पूर्वापार चालत आलेलं आहे? एकदा तर असं झालेलं, की वेंडीला बोलायला आवडत होतं अशा एका मुलाने तिला परतून मेसेज केलाच नाही, तेव्हा त्याच्यामागचं कारण तिने टाकलेलं एक जास्तीचं उद्गगारवाचक चिन्ह असावं का? याचाही विचार वेंडीने केला होता. रात्री ३ ला वेंडीला बोलावंसं वाटलंच, तर ते फक्त मैत्रीखात्यातलं असू शकतं, त्यात फक्त vulnerability असते, तुमच्याबद्दल वाटणारा विश्वास असतो, हे इतक्यावरच नाही का थांबू शकत? I listened to your rant, so I can get into you pants हे मिसइंटरप्रीटेशन नंतर का निस्तरावं लागतं? त्यातून येणारा मनस्ताप भोगणं हे क्रमप्राप्त असतं का?

न कळे.

हे फक्त वेंडीचंच आहे, की इतरांचंही - हेही न कळे.

विचार म्हणजे वस्तुस्थिती नव्हे हे कळत असलं, तरी या अशा खूप वाटण्याचं काय करावं?

मोनोलॉग मोड ऑफ.

---

याआधीचे : मो.मोडॉनेय. | मो.मोडॉनेय-पुन्हा. 

जायते यस्मात्..

संध्याकाळचं कलतं उन्ह खिमटीसारखं कोमट झालं, की सूर्यास्तापर्यंतची पन्नास मिनिटं हातात उरतात. यावेळी घरात बसवत नाही. काहीतरी निसटून जाण्याच्या आधी ते पकडून ठेवलं पाहिजे असा वेडसर विचार (रोज!) येतो. 'काय' निसटून चाललंय ते मात्र बोट ठेवून सांगता येत नाही. त्या सरत्या उन्हात उभं राहिलं तर प्रकाशासारखे आपणही विरघळून जाऊ, पुरते दिसेनासे होऊ असं वाटतं. मनाची घालमेल होत राहते. 

मग मी बाहेर पडते.

एका तलावाला मध्ये धरून चालण्यासाठी केलेली एक गोलाकार जागा आहे वसईत. या तलावाचं नाव तामतलाव.  ताम्रतलावाचं नामकरण झालं तामतलाव. माझ्याही आधीपासून असलेला तामतलाव आता पुरता आधुनिक झालाय. पूर्वी किर्र अंधारात पोटात रहस्य वागवत शांत पहुडलेला काळाकभिन्न तलाव आता रोषणाईने सजलाय, पुरता माणसाळलाय. पण मनातून - पावसाळा आला की ऊतू जाऊन तामतलावच्या रस्त्यांवर सांडणारा, हिवाळा आला की जलपर्णीच्या नाजूक जांभळ्या फुलांनी सजणारा तो तलाव मला त्याच्या अस्तावस्त्य वाढलेल्या नैसर्गिक रूपातच खूप आवडायचा. त्याच्या चारही बाजूंनी उंचचउंच वाढलेली झाडं होती, तलावात कासवं होती, मासे होते, माशांच्या पोटात दुसरे मासे होते. एकदा तर तिथे मगर आली होती अशी आवई उठली होती. चारही बाजूंनी बंद असलेल्या तलावात मगर येऊच कशी शकते? पण त्या तलावाविषयी लोकोपवादच इतके होते, की त्यावेळी त्या तलावाविषयी सर्वकाही खरं वाटायचं. सपना टॉकीजला आम्ही 'ज्युरासिक पार्क' पाहिला त्यानंतरचे कित्येक दिवस त्या तलावातून एक डायनोसॉर हॉव्व करत बाहेर येईल असंही वाटायचं. 

त्या तलावाच्या बाजूला पालिकेचं एक छोटंसं खेळघर होतं पूर्वी. मोबाइल, गेम्स काहीही नव्हतं तेव्हा आमच्याकडे. घसरगुंड्या, सी-सॉ, पाळणा हे इतकंच मुद्दल असलेल्या खेळघरात तासनतास खेळता येतं हे आजच्या पिढीला सांगून खरं वाटेल का? त्या घसरगुंडीच्या पायथ्याशी असताना साधासुधा, नेहमीसारखा दिसणारा तलाव घसरगुंडीच्या सर्वात वर असताना वेगळा भासायचा. काळाभोर, शांत. त्या शांततेत काही डचमळलं की घाबरगुंडी उडायची आणि भंबेरी उडून घसरगुंडीवरून खाली यायची घाई लागायची.

आताही मी त्या तलावाला गरगर फेऱ्या मारतेय तेव्हा गजांमधून कारंजं पिऊन घेणारी छोटी पोरं दिसताएत. सारखे-सारखे फ्रॉक घातलेल्या जुळ्या पोरी आहेत. "कारंज्यातलं पाणी लाल नाई काही, मरून आहे" असं मोठ्या बहिणीने म्हटल्यावर तिच्याकडे भक्तिभावाने पाहणारी लहान बहिण आहे. शतक बदललं, पण काही गोष्टी अजूनही तशाच आहेत, 'देजा वू' वाटावं इतक्या. 

कारंजावरून आठवलं-

आम्ही काही फार श्रीमंत नव्हतो, पण आमच्या आईबाबांनी आम्हाला खूप ठिकाणी फिरवलं. महाराष्ट्र तर जवळपासच सगळाच फिरलो. पण त्या प्रवासातल्या आता अधमुऱ्या होत चाललेल्या आठवणींमधली एक आठवण कालच पाहिली असावी इतकी ताजी आहे. पैठणचं ज्ञानेश्वर उद्यान आणि तिथल्या कारंज्यांचा एक शो. माझं वय अवघं सहा-सात. त्यावेळी 'मोगरा फुलला' हे गाणं ऐकलेलं देखील नव्हतं, पण कारंज्याभोवतीच्या गजांमध्ये तोंड खुपसून 'आs' वासून पाहिलेलं, 'फुले वेचिता बहरु' मधल्या 'रु' वर खाली येऊन कळीयासी वर चारदा थुयथुयणारं कारंजं माझ्या मनात कसं कच्चकन् रुतून बसलंय. लताबाईंच्या आवाजाच्या सप्तकांनुसार ते कारंजंही वरखाली होत होतं. त्यावेळी 'इवलेसे रोप' वर खरंच गगनावेरि गेलेलं ते कारंजं आठवून मन गलबलतं, त्यावेळी त्या आठवणी जमवणारं मन किती कोवळं, अनाघ्रात होतं हे आठवून. मनाचं मैत्र कधी कशाशी जुळेल काही सांगता येत नाही. त्यानंतर बाटत गेलेल्या बोडक्या मनातल्या अपडेट, अपग्रेड केलेल्या, कधी गरजेनुसार ऑल्टर केलेल्या आठवणींमध्ये ही आठवण काहीही फेरफार न होता तशीच्या तशी आहे अजून. दहा-पंधरा वर्षांपासूनचे दोनचारच मैतर प्रचंड मोलाचे वाटावेत, तशी ही आठवण मला खूप श्रीमंत वाटते.

समुद्राकाठी जगल्या-वाढलेल्या लोकांसाठी वाहते पाणी हा जीवनाचा संदर्भ होऊन बसतो. समुद्राकाठी, नदीकाठी न वाढलेल्या लोकांना मी इमारतींनी बरबटलेल्या बंगळुरुमध्ये दोन मेट्रो बदलून फक्त एक तळं पाहायला का जाते हे कदाचित म्हणूनच समजणार नाही, फक्त तिथेच गेल्यावर शांत का वाटतं, 'अ‍ॅट होम' का वाटतं, हे पटणार नाही. माझ्या जवळपास सर्वच आठवणींमध्ये समुद्र किंवा नदी आहे. माझ्या जवळपास सर्वच आठवणींना पाण्याचा संदर्भ आहे. मला आवडू शकतील अशा सर्वच माणसांना मी समुद्र बाजूला ठेवून भेटलेले आहे. दुबई मॉलमधला बुर्ज खलिफाच्या पायथ्याशी चालणारा फाउंटन शो पाहिला नव्हता, एन्रिकेच्या 'हिरो'वर एकत्र डोलणारी कारंजी पाहिली नव्हती, तोपर्यंत आईशप्पथ मला एन्रिके छपरी वाटायचा, बीबर अजूनही वाटतो तसा. पण त्या कारंजाने त्या गाण्याची परिमाणं बदलून टाकली. गाण्यांना विवक्षित संदर्भ मिळाले, की ती गाणी मनात रुतून बसतात, तसंच या आठवणींचं झालंय.

जायते यस्मात् लीयते यस्मिन इति जल:

पाण्यातून यायचं, पाण्यातच जायचं आणि अध्येमध्ये मग हे असं आठवणींचं तर्पण वाहत बसायचं.

येवा..आपलाच आसा

गणपतीपुळ्याला गेलो, की आपण गाऱ्हाणं सांगतो, नवस बोलतो किंवा साकडं घालतो. यावेळी "बाप्पा, मन:शांतीसाठी काही कर देवा, हा कोलाहल नको वाटतो आता" असं गाऱ्हाणं घातलं आणि ही आमची आर्त साद बहुधा पुळ्याच्या गणपतीने ऐकली; कारण, पुळ्यापासून दोन किलोमीटर्सच्या आतच आम्हाला आमच्या उबगलेल्या अस्वस्थ, प्रक्षुब्ध मनांसाठी एक उतारा मिळाला - मालगुंडमधील 'कवी केशवसुत स्मारक' नामक कवितास्मारकाच्या रूपाने.

साधारण २५ वर्षांपूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने  केशवसुतांचे जन्मघर आणि त्या घराच्या आसपासचा एक एकरचा परिसर हा कवितांना वाहिलेला परिसर म्हणून घडवण्यात आला, तेच हे ‘कवी केशवसुत स्मारक’. स्मारकाच्या पुढच्याच अंगाला केशवसुतांचे छोटेखानी घर उभे आहे. मातीच्या त्या घराला बिलकुल धक्का न लावता मागील अंगाला स्मारकाचा विस्तार करण्यात आला आहे. नवकवितेची नांदी म्हणून तुतारी वाजवणाऱ्या कवीचे नवशिल्प उभे करण्यात आले आहे. शिल्पाच्या बरोब्बर मागे केशवसुतांच्या पाषाणात कोरलेल्या कविता आहेत. ही पाषाणातली काव्यशिल्पे पाहिली, की नवकवितेचे प्रवर्तक शिलेदार शिस्तबद्ध पद्धतीने केशवसुतांना सलामी देत असावेत असे वाटते, त्यांच्या 'नवा शिपाई' कवितेसारखे. स्मारकात सुरेख वाचनालय आहे आणि १९५० सालापासून ते २००० पर्यंतच्या कवींच्या हस्तलिखित/टंकलेल्या कवितांचे दालनसुद्धा आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या कवितांमधून बहरणारा चाफा इथेही कानाकोपऱ्यातून डोकावतो. वनश्रीने नटलेला हा परिसर कोकणातल्या रणरणत्या उन्हाने कावलेल्या जीवांना आपसूकच शांत करतो, आत्ममग्न करत जातो. या वास्तूची योजनाच तशी असावी. नॉस्टॅल्जियामध्ये, तुमच्या भूतकाळातल्या आठवणींच्या ओढीने तुमच्या मेंदूमध्ये स्रवलेल्या डोपामाईनमध्येही तशीही तुम्हाला शांतवण्याची अभूतपूर्व ताकद असतेच.



कोणीही वृत्तबद्ध, छंदबद्ध कवितांना कितीही नाकं मुरडू देत, इथे आल्यावर आठवतात त्या बालपणी, शाळेत चालीवर म्हटलेल्या कविताच. मंदाक्रांता मभनततगा, शार्दूलविक्रिडित नावाचे जिभेला गाठी घालणारं वृत्त, मात्रा, गण..काय बहार! आठवणीतल्या सांदीकपारीत कुठेकुठे लपून बसलेल्या या आठवणींनी अचंबा वाटला आणि हेलावून गेल्यासारखेही वाटले. मुक्तछंदातली फक्त एकच आठवली - ढसाळांची 'अगणित सूर्यांनो', तेही ती नारकरांनी त्यांच्या रांगड्या आवाजात बोलून मेंदूवर कोरल्याने. याच वृत्तबद्ध कविता अनेकांसाठी डोकेदुखी होत्या हा सूरही तिथे खूपजणांकडून ऐकायला मिळाला. कविता म्हणजे अभ्यासक्रमातला केवळ परीक्षेत गुण मिळवण्याकरिता केलेला खटाटोप. पण, ही कुरकूर करणारी बाप्ये आणि बाईलोकंही मोठ्या उत्साहात मोठाल्या आवाजात कविता म्हणत आहेत आणि 'बाबा, इझ दिस मराट्टी पोएट्री?' विचारणारी त्यांची ज्युनियर पार्टी त्यांच्याकडे डोळे मोठमोठाले करून कौतुकाने पाहात आहे हे चित्र मोठं लोभस होतं. यापेक्षा प्रेरणादायी दुसरं काय असू शकेल? 

या कवींच्या कविता आवडत नसणारा किंवा त्या कालबाह्य आहेत असे वाटणारा एक वर्ग आहे. त्यांचा विचार त्याज्य नाही. केशवसुतांनीही त्यावेळच्या प्रस्थापित कवितेला आवाहन दिलंच होतं. पण काहीही असो, तुमच्यालेखी तुमच्या कवितेमध्ये काय नसावं, तुमची कविता कशी नसावी हेदेखील तुम्हाला याच कवींनी शिकवलं; तेव्हा, तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण काही अंशी त्यांचं देणं लागतोच. या कवितांमधील शब्दबाहुल्य, आशयघनता, शब्दसंपदा, अर्थगर्भ विषय, त्यांची लयबद्धता, नादबद्धता आणि त्यांचे साहित्यिक मूल्य वादातीत आहे.

कोमसापतर्फे मालगुंड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये विविध साहित्यिक कार्यक्रम होत असतात, शिवाय स्मारकामधील वाचनालयाचे सदस्यही वाढत आहेत असे वाचण्यात आले. स्मारकाच्या पाठीमागे एक अतिशय भव्य अ‍ॅंफीथेटर आहे, पण अ‍ॅंफीथेटरमध्ये लोकं असली की ते अधिक साजिरं दिसतं, नाहीतरी भयाण भुताळी ओसाड वाटतं. आम्ही गेलेलो तेव्हा असंच वाटलं ते - नोकरीधंद्यापायी पोरंबाळं म्हमईला पांगल्याने ओस पडलेल्या कोकणी घरासारखं. हौशी कवींनी, फेसबुकवरच्या कवितांच्या ग्रुप्सनी इथे कविता मेळावे भरवावेत, या कवींच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावं. कवितालेखनाच्या कार्यशाळा घेतल्या जाव्यात आणि 'पहिले कविता संदर्भ ग्रंथालय' म्हणवल्या जाणाऱ्या या ग्रंथालयात दिवसच्या दिवस वाचन व्हावे. आजच्या मिंग्लिश पिढीला इथे आणून बाकीबाब यांच्या कवितांचं देखणेपण उलगडून सांगावे, त्यांच्यासाठी कवितावाचनाच्या स्पर्धा भरवाव्यात. केशवसुतांचं माल्यकूट अर्थात मालगुंड हे कवितांचे गाव व्हावे. हे केले, तरच हे निव्वळ स्मारक न राहता नांदते कविताघर बनेल आणि या कवींचे ऋण काही अंशी फेडल्यासारखे होईल.

--

व्हेनी, व्हिदी, सेपी - मी आले, मी पाहिले आणि मी फोटो काढला

स्मार्टफोनच्या जमान्यातला हा अलिखित नियम आहे. शिवाय इतक्या सुंदर वास्तूत आल्यावर फोटो काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे. इथे फोटो काढल्यास कोणी तुम्हाला हटकत नाही, पण जागोजागी लागलेली ती 'छायाचित्रे काढू नये' ची पाटी सलत राहते. आपल्याला जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे काम पोहचवायचं आहे, पण जे आवर्जून तिथे येत आहेत त्यांना फोटोही काढू द्यायचे नाही आहेत, हे कसे काय? व्हिडिओ घेण्यास परवानगी नसणे समजण्यासारखे आहे आणि ती अपेक्षा रास्तही आहे, पण फोटो काढण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा असे मनापासून वाटते. या ठिकाणाचे माहात्म्य, त्याचे महत्त्व शब्दांमधून पोहोचवता येईलही कदाचित, पण शब्दांनाही मर्यादा असतात. शब्द तोकडे पडतात, तिथे छायाचित्रे मदतीला धावतात. 'आम्ही इथे येऊन गेलो' हे सांगण्याचा सगळ्यात सोप्पा आणि प्रभावी मार्ग कोणता असेल, तर हा. आयुष्यभर पुरणारी आठवण म्हणजे फोटो.

एक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं

फोटोमधून 'दास्तां' नाही पोहोचणार कदाचित, पण 'लम्हा' तर नक्कीच पोहोचेल?  

आपण लंडनला गेलो, की लायस्टर स्क्वेअरला जाऊन शेक्सपिअरचा पुतळा पाहतो, शेक्सपिअर वाचलेला नसलेला तरी 'टू बी ऑर नॉट टू बी' किंवा 'ब्रुटस यू टू?' ही माहीत असलेली वाक्यं टाकून अभिमानाने जगाला सांगतोच, नाही का? तसं इथेही व्हावं. भूगोल वेगळा असला, तरी विचार तोच आहे. रत्नागिरीला गेलं की पुळे, वेळणेश्वर, गुहागर, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, मासे खाणं तुमच्या यादीत असेलच, पण केशवसुत स्मारकही त्यात जरूर असू द्या. कोकणची 'तुतारी एक्प्रेस' केशवसुतांच्या तुतारीची ललकार कोकणभर फिरवत असते, ती आता कोकणाच्या बाहेरही ऐकू यावी. कोकण पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करत असेलच, पण ते प्रयत्न वृद्धिंगत व्हावेत अशी अपेक्षा.

तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी, की पुळ्याचा गणपती आम्हाला अशा रितीने पावला.

---

थोडी माहिती:

Google Maps मधले लोकेशन - कवी केशवसुत स्मारक (https://maps.app.goo.gl/frJtZx6zfUpo92YH6)
कसे जाल?
जवळचे विमानतळ - मोपा किंवा दाबोलिम
गणपतीपुळ्याला येणाऱ्या-जाणाऱ्या खूप बसेस आहेत. एस.टी महामंडळाच्या तर आहेतच आहेत. पुळ्यापासून हे ठिकाण अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे. 
जवळचे रेल्वे स्थानक - रत्नागिरी
स्मारकात किती वेळ जातो - ते तुमच्यावर आहे. कोणी तुम्हाला एक तासानंतर 'जा' असं म्हणणार नाही
प्रवेशमूल्य - १० रुपये प्रत्येकी. लहान मंडळींसाठी ५ रुपये प्रत्येकी.
 
Designed by Lena